शेतकरी ते उद्योजक: काळ्या आईच्या सेवेतून समृद्धीकडे जाणारा नवा मार्ग!
Share
काळ्या आईची अविरत सेवा करणारा आपला शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पण आज जर आपण पाहिले, तर हा पोशिंदा कर्जाच्या ओझ्याखाली, निसर्गाच्या लहरीपणाखाली आणि चुकीच्या सल्ल्यांच्या विळख्यात अडकलेला दिसतो. कधी बियाणे बोगस निघते, तर कधी हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो. अशा वेळी मनात नैराश्य येणे स्वाभाविक आहे. पण थांबा! निराश होऊन चालणार नाही. काळ बदलतोय, तंत्रज्ञान बदलतेय आणि आता वेळ आली आहे ती आपली शेती करण्याची पद्धत बदलण्याची.
जर आपण कर्जमाफीच्या आशेवर बसण्याऐवजी, 'उद्योजक' बनण्याची मानसिकता ठेवली, तर येणाऱ्या २० वर्षांत आपला शेतकरी हा देशातला सर्वात मोठा व्यावसायिक बनेल, हे नक्की. याच बदलाची नांदी कशी असावी, यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप:
१. स्वतःचे बियाणे, स्वतःचा प्रयोग (बनावट खते आणि औषधांपासून मुक्ती)
आज बाजारात गेलो की आकर्षक जाहिराती भुरळ घालतात. 'आमचे खत वापरा, ४० क्विंटल उत्पन्न काढा' अशा भूलथापांना शेतकरी सहज बळी पडतो. पण वास्तवात काय होते? खताच्या पोत्यात माती आणि औषधाच्या बाटलीत फक्त पाणी! या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे - स्वतःचे बियाणे स्वतः तयार करणे. आपल्या पूर्वजांची पद्धत आठवा. ते पुढच्या वर्षासाठी उत्तम दर्जाचे बियाणे घरातच जपून ठेवायचे. आज आपल्याला पुन्हा त्याच पारंपरिक शहाणपणाकडे आधुनिकतेची जोड देऊन वळायचे आहे. मातीची सुपीकता (पोत) वाढवण्यावर भर द्या, कारण जमीनच सुपीक नसेल तर कोणतेही बियाणे किंवा खत जादू करू शकत नाही.
२. 'लेकुरवाळी शेती' आणि बहुपीक पद्धती
सर्कशीत काम करणारा माणूस एका दोरीवर चालतो, दोरी तुटली की खेळ संपला! एकाच पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याची अवस्थाही अशीच आहे. निसर्गाचा फटका बसला की सर्व काही उद्ध्वस्त होते. शेती ही 'लेकुरवाळ्या बाई'सारखी असली पाहिजे. जसे एका आईच्या घरातल्या उतरंडीत थोडी तुरीची डाळ, थोडे मूग, थोडी बाजरी अशी संसाराची सर्व बेगमी असते, तशीच शेती असावी. एक पीक गेले तरी दुसऱ्या पिकाने आधार दिला पाहिजे. फळबागा, नगदी पिके आणि तृणधान्ये असा समतोल साधा.
३. शेतीतील 'लक्ष्मी'चा खरा सन्मान
शेतीत ७०% काबाडकष्ट महिला करते. निंदणीपासून ते खुरपणीपर्यंत, पण जेव्हा बँकेचा चेक साइन करायची वेळ येते, तेव्हा तिथे पुरुषाची सही चालते. ही परिस्थिती बदलली पाहिजे. महिलांकडे आर्थिक नियोजनाचे जन्मजात कौशल्य असते. नोटाबंदीच्या काळात आपल्या आई-बहिणींच्या डब्यातूनच ५०० आणि २०० च्या नोटा बाहेर आल्या होत्या, हे विसरून चालणार नाही! शेतीचा वर्षभराचा खर्च किती? बियाणे, खते, मुलांचे शिक्षण आणि घरातील आजारपण याचे नियोजन घरातल्या माऊलीसोबत बसून करा. तिला विश्वासात घ्या. जेव्हा घराची 'मालकीण' आर्थिक निर्णय प्रक्रियेत सहभागी होईल, तेव्हा शेतीत खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदेल.
४. तरुणांनो, पदव्या बाजूला ठेवा आणि 'अन्ननिर्माता' बना!
शेतीमध्ये आता सुशिक्षित तरुणांची गरज आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा - एमबीए (MBA) किंवा ॲग्रीची पदवी घेतली म्हणजे तुम्ही थेट यशस्वी शेतकरी झालात असे नाही. पीक हे कागदावर नाही, तर मातीत पिकते! आणि मातीचा अनुभव हा बापाकडून किंवा एखाद्या अनुभवी शेतकऱ्याकडूनच मिळतो. दोन वर्षे मातीत राबा. आता तुम्ही केवळ 'अन्नदाता' किंवा पीक उत्पादक राहू नका, तर 'अन्ननिर्माता' बना. स्वतःचा माल स्वतः प्रोसेस करा. दलालांना बाजूला काढा आणि व्हॉट्सॲप, सोशल मीडिया किंवा AI (Artificial Intelligence) च्या माध्यमातून थेट आपले ग्राहक शोधा. १ रुपयाचा माल १० रुपयांना कसा विकायचा, हे कौशल्य आत्मसात करा.
५. तंत्रज्ञान आणि AI: भविष्यातील स्मार्ट शेती
भविष्यात पाणी ही सर्वात मोठी समस्या असणार आहे. पण येणारे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान तुमच्या पिकाच्या मुळाला नेमके किती थेंब पाणी हवे आहे, याचा हिशेब ठेवेल. तुमच्या मोबाईलवर मुंबई-पुण्यात तुमच्या मालाला काय भाव आहे, हे घरबसल्या कळेल. कचरा आणि उसाच्या पालापाचोळ्यापासून 'इथेनॉल' तयार करून त्यातूनही पैसा मिळवण्याचे मार्ग आता खुले होत आहेत. ही स्मार्ट शेती आत्मसात करण्याची तयारी ठेवा.
६. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवा मंत्र: शेतीपूरक व्यवसाय
तुमच्याकडे १-२ एकर शेती आहे आणि उत्पन्न फक्त ५० हजार आहे? मग ५० हजार मिळवण्यासाठी १ लाखाचे कर्ज काढू नका. त्या ५० हजारांतून शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग किंवा दुग्धव्यवसाय सुरू करा. बांधावर फळझाडे, नारळाची झाडे लावा (आज एक पाण्याचे नारळ १०० रुपयांना मिळते!). जेव्हा या जोडधंद्यातून हातात खेळता पैसा येईल, तेव्हाच मोठी झेप घेण्यासाठी बँकेचे कर्ज काढा, कारण तेव्हा तुमच्यात ते फेडण्याची ताकद आलेली असेल.
कर्जमाफी नको, आर्थिक स्वातंत्र्य हवे!
शेतकरी बांधवांनो, नुसते मोर्चे काढून आणि कर्जमाफीच्या आशा लावून आपण कधीच श्रीमंत होणार नाही. हे दुष्टचक्र आता आपल्यालाच थांबवायचे आहे. जर आपण आज ठरवले की मला माझे घेतलेले कर्ज माझ्या मेहनतीने आणि व्यवसायाच्या माध्यमातून फेडायचे आहे, तर येणारी २० वर्षे तुमचीच आहेत.
चला, आजच ठरवूया... रडणारा नाही, तर लढणारा आणि स्वतःचे मार्केट स्वतः उभा करणारा 'उद्योजक शेतकरी' बनूया! काळी आई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही, फक्त तिच्या कुशीत ज्ञानाचे आणि आधुनिकतेचे बीज पेरायला हवे!
शेतकरी बांधवानो रिसेटएग्री व्हाटस्अप चॅनल ला भेट द्या, जॉइन व्हा. आपले चैनल वाढावे म्हणून सदर पोस्ट इतर व्हाटसअप ग्रुप मध्ये अवश्य शेअर करावी. धन्यवाद!





1 comment
We want knowledge. &help.pls.